मुंबई: महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यामागे कोणताही उद्देश नाही, ही प्रक्रिया नियमानुसार झाली, असा दावा रेल्वे आणि केंद्रीय वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. ‘भारताला सीएएची गरज का?’ या विषयावर मुंबईत आयोजित जाहीर कार्यक्रमात गोयल बोलत होते.

चित्ररथाला नाकारणं हे नियमाच्या अनुषंगाने झालेलं आहे. हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियुष गोयल म्हणाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांना परवानगी नाकारल्यामुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांशी आकसातून दुजाभाव केल्याचा आरोप झाला होता. त्यावर भारतीय जनता पक्षाशासित हरियाणाचा दाखला गोयलांनी दिला. यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल क्रमांक पटकावत होता.

दरम्यान, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रानंतर केरळचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राप्रमाणे केरळचा चित्ररथही पाहायला मिळणार नाही. केरळने यावेळी पारंपारिक कलेवर आधारित चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु हा प्रस्ताव नाकारण्यात आला. याआधी संरक्षण मंत्रालयाच्या विशेष समितीने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारने दिलेला प्रस्ताव नाकारला आहे.

चित्ररथाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राजकीय नाट्य रंगलं आहे. मात्र सरकारने सर्व आरोप फेटाळून लावत जाणुनबुजून प्रस्ताव फेटाळल्याचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. चित्ररथाच्या निवडीपूर्वी सर्व राज्यांना बैठकीसाठी बोलावले जाते. चर्चेच्या ३-४ फेऱ्या झाल्यानंतर निवडीच्या प्रक्रियेला वेग येतो. दरवर्षी फक्त १६ राज्यांच्याच चित्ररथांची निवड केली जाते.

 

Web Title:  Union Railway Minister Piyush Goyal on Permission rejected to Maharashtra State Tableau in Republic day Parade.

महाराष्ट्र, केरळ व प. बंगालचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट होते त्यांनाच संधी : पियुष गोयल