मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भारतीय जनता पक्ष हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार बनेल. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं वाटपाचं काहीही ठरलं नव्हतं. आवश्यकता भासल्यास आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही गडकरी यांनी महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. तसंच या प्रकरणाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा कोणताही संबंध नाही. मी मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी दिल्लीतच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
त्यात अमित शहा दिल्लीतच व्यस्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. कारण मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवणं शक्य झालेलं नाही. अशातच आमच्याकडे भारतीय जनता पक्षालाही पर्याय आहे, असा दावा शिवसेनेकडून करणयात येत आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं सत्तासमीकरणही नाकारता येत नाही.
दरम्यान, जनतेचा जनादेश मिळूनही सरकार स्थापन होत नसल्याचे दु:ख व्यक्त करताना राज्यात महायुतीचे सरकार येईल की नाही यावरही शंका असल्याचे वक्तव्य महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठूमाऊलीची चंद्रकांत पाटील यांनी सप्तनीक पूजा केली. काल, गुरुवारी ते पुजेकरता पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
