मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुमारे ९ कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या ३,२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. महिनाभर सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीची शनिवारी सांयकाळी सांगता झाली. गेल्या ४८ तासांत वैयक्तिक भेटी-गाठी व इतर संपर्क साधनांच्या माध्यमांतून मतांची बेगमी करण्यावर उमेदवारांनी भर दिला. काही ठिकाणी पैसेवाटपावरून उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना होतो. पण हा सेल्फी मतदान केंद्रात घेणे पूर्णपणे टाळावे. केंद्राच्या आत अधिकृत परवानगीखेरीज फोटो काढण्यावर निर्बंध आहेत. केंद्राच्या बाहेर ५० मीटरनंतर सेल्फी घ्यायला हरकत नाही.

मतदान केंद्रात मोबाइलवर बोलण्यास मनाई असेल. मतदान केंद्राच्या आवारातही मोबाइलचा उपयोग शक्यतो करू नये. केंद्र परिसरात प्रवेश केल्यापासून मतदान करून बाहेर पडेपर्यंत मोबाइलचा वापर टाळावा. मोबाइल सायलेंट अथवा बंद करून ठेवावा.

मतदान केंद्राचा १०० मीटरपर्यंतचा परिसर संवेदनशील श्रेणीत असतो. कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी त्या परिसरात वाहन पार्किंगला मनाई असते. यामुळे तेथे वाहन उभी करू नये. मतदान केंद्र परिसरात घर असल्यास वाहने उभी करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतल्यास उपयुक्त ठरेल.

उत्सव लोकशाहीचा: मतदानाचा हक्क पार पाडण्यासाठी मतदार सज्ज