मुंबई : सध्या राज्यावर पुराचे संकट असताना निवडणुकांची चर्चा कशाला असा सवाल करत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या अप्रत्यक्ष रोख हा राज ठाकरे यांचावर होता.
शिवसेनेच्या वतीने कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेची मदत पथके रविवारी रवाना झाली. त्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. सध्याचे पुराचे वातावरण पाहता विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर संकटकाळात निवडणुकांची चर्चा कशाला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महानगरपालिकांमधील महापौर तसेच उपमहापौरांचा कालावधी संपणार आहे. मात्र त्यांच्या निवडणुका आता ३ महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, उल्हासनगरसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या महापौर-उपमहापौरपदासाठीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मार्च २०१७ मध्ये निवडले गेलेले महापौर तसेच उपमहापौर यांची मुदत या महिनाअखेर संपत असून आता त्यांना ३ महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. राज्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणुका पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कालावधी ८ सप्टेंबर रोजी संपणार होता. मात्र निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे त्यांना ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान, या निर्णयासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
