मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मंगळवारी मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीनेते धनंजय मुंडे यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसला राज्यात ६ जागा जेमतेम राखता आल्या. राष्ट्रवादीला मुंबईतील एकमेव सीट गमवावी लागली. तर कॉँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्‍वभूमीवर उद्या धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित फॅक्टरच्या प्रभावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्यांनी विधानसभेत जास्त ताणून धरल्यास त्याचे परिणाम लोकसभेपेक्षा भयानक असतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी काँग्रेसपेक्षा मनसे आणि इतर छोटे पक्ष अधिक महत्वाचे ठरतील असं म्हटलं जात आहे.

त्यात सदर बैठक सुरु होण्यापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक विषयांना तोंड फुटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा एखादा निरोप किंवा विषय समजून घेऊन राजू शेट्टी तो आजच्या बैठकीत मांडणार का असा देखील कयास अनेक पत्रकारांनी या बैठकीबद्दल मांडला आहे.

आज राष्ट्रवादी-कॉंग्रेसची मुंबईत आढावा बैठक; तत्पूर्वी राजू शेट्टीं व राज ठाकरे यांची भेट