मुंबई: लोकसभेच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असून लवकरात लवकर तो जाहीर करु अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवेसना भवनात नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. १३५-१३५ चा फॉर्म्युला मीडियानेच पसरवला असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तसंच लवकरात लवकर आपण उमेदवारांची घोषणा करु असंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या राम मंदिरासंबंधी केलेल्या वक्तव्यासंबंधी विचारलं असता मोदींनी केलेली विनंती रास्त आहे असं सांगितलं. “राम मंदिरासंबंधी मी कोणतंही वक्तव्य करत नसून फक्त भावना व्यक्त करत आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायव्यवस्था कोणत्याही हस्तक्षेपाला बळी न पडता न्याय देत असते. न्यायालयाकडून मिळालेला न्याय हा न्याय असतो. तो निष्पक्ष असतो,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
तत्पूर्वी, उद्धव यांनी शिवसेनेचे नेते व मंत्री यांच्याशी युतीच्या जागावाटपाच्या संदर्भात सुमारे तासभर चर्चा केली. ‘चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. युती होईल अशी परिस्थिती आहे. मात्र, सन्मानजनक जागा मिळाल्या तरच त्यावर शिक्कामोर्तब होईल,’ असं उद्धव यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळं संभ्रम वाढला आहे.
शिवसेना-भाजपमध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्मुला ठरला असून शिवसेना त्यावर समाधानी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आजची बैठक बोलावली होती. पण शिवसेनेला हव्या असलेल्या सन्मानजनक जागा म्हणजे नेमक्या किती जागा, हे मात्र कळू शकलेलं नाही.
राम मंदिरावरून बडबड करणाऱ्या वाचाळवीरांना मी हात जोडून विनंती करतो की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवावा, कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी, असं नरेंद्र मोदी यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी म्हटलं होतं. त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण त्यांचा निशाणा शिवसेनेवर होता. एकीकडे भाजपा-शिवसेना युतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना, शिवसेनेला कमी जागा देऊन जास्त जागा घेण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असताना आणि त्यावरून शिवसेना नेते युती तोडण्याची धमकी देत असतानाच मोदींनी हा टोला हाणल्यानं राजकीय वर्तुळाचे कान टवकारले होते. आता उद्धव ठाकरे काय बोलणार, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव यांनी अगदीच शांतपणे मोदींच्या शब्दाला उत्तरं दिली.
