मुंबई: देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अनुमोदन दिले. याद्वारे आता भारतीय जनता पक्षाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis elected as the leader of Maharashtra BJP legislative party. (file pic) pic.twitter.com/5ePWDI5kho
— ANI (@ANI) October 30, 2019
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, नरेंद्रसिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना उपस्थित आहेत. या बैठकीत नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. भारतीय जनता पक्षाची ही बैठक केवळ औपचारिकता म्हणून घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच विधिमंडळ नेतेपदी पुन्हा एकदा निवड होण्याचं निश्चित होतं. आजची ही बैठक भारतीय जनता पक्षानं सत्तास्थापनेसाठी पहिलं पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी आपली जडण-घडण, गेल्या ५ वर्षात जे काम केलं त्यापेक्षा चांगलं काम पुढील ५ वर्षात करायचं आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. महायुती म्हणून आपण निवडणूक लढलो, जनतेने महायुतीला कौल दिला, राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. कोणत्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. उत्तम सरकार पुन्हा स्थापन होईल, असं देखील फडणवीस म्हणाले.
