मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं अक्षरशः धुमशान घातला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. बंगलाच्या उपसागरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपटटी, मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सोमवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अँटॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं.
दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका गणेश मंडळांना; वीज गेली अन् मंडपात पाणीही शिरले आहे. माटुंगा-सायन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे लालबाग परिसरातही गणेश भक्तांची गर्दी ओसरली असून एरव्ही 12-14 तास रांगेत उभं राहून मिळणाऱ्या लालबागच्या राजाचं दर्शन सध्या 10 ते 15 मिनिटात उपलब्ध होत आहे. पावसामुळे गणेश भक्तांची गर्दी कमी झाली आहे.
