औरंगाबाद : नामकरण वादावरून रामदास कदम यांचे शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी खटके उडाल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोडावं लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. रामदास कदम आता नांदेडचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले असून औरंगाबादची जवाबदारी दिपक सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अशी सूचना खुद्द शिवसेना पक्षप्रमुखानीच केल्यामुळे आज राज्य सरकारने तसे फेरबदलाचे आदेश काढले आहेत.

नक्की हा वाद आहे तरी काय ते जाणून घेऊया ;

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेंनी बऱ्याच वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावं असा मुद्दा उचलून धरला आहे. परंतु सध्या मोठ्याभावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने या नामकरणाचं श्रेय शिवसेनेला मिळू नये भाजपने हा विषय जाणीवपूर्वक टाळला आहे. परंतु मागे एका कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री आणि पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी हा विषय उचलून धरण्यापेश्या उलट चंद्रकांत खैरेंना फटकारलं. ‘खैरे खासदार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पाहावं. गरज पडली तर वेलमध्ये बसावं. पण साप-साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा.’ अशी शेरेबाजी रामदास कदमांनी एका कार्यक्रमात केली होती.

या आधी ही या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक कार्यक्रमात टीका टिपणी केली आहे. त्यातच औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनीच्या मुद्यावरूनही दोघांमध्ये प्रचंड वाद होते आणि त्यामुळेच औरंगाबाद शिवसेनेमध्ये दोन वेग वेगळे गट पडले होते. परंतु निवडणूक जवळ आलेल्या असताना आणि स्थानिक शिवसेनेत या दोन नेत्यांमुळे दोन गट पडल्यामुळे त्याचे दुष्परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागू शकतात त्याचीच दखल शिवसेना नैतृत्वाने घेतली आणि त्याचाच भाग म्हणून अखेर रामदास कदमांची औरंगाबाद पालकमंत्री पदावरून उचल बांगडी करण्यात आली आहे असं बोललेलं जात आहे.

Aurangabad MP Khaire vs Ramdas Kadam