हैदराबाद : विकासाचे ढोल वाजवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला २०१९ मधील निवडणुकीत अखेर राम मंदिराचाच भावनिक आधार घ्यावा लागणार आहे असं चित्र आहे. कारण तसे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. त्यांच्या नुसार २०१९ च्या निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर उभारणीला सुरुवात केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
हैदराबाद येथे भाजपच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राम मंदिर २०१९ च्या निवडणूकीपूर्वी बांधण्यास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु राम मंदिरासारख्या विवादित मुद्याला पुन्हा फुंकर घातल्याने हा मुद्दा निवडणुकीपूर्वी पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी एकतर्फी वक्तव्य करत थेट निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी योग्य ती पावले उचललेली जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपा नेते पी. शेखर यांनी माध्यमांशी बोलताना ही बैठकीतील माहिती बोलून दाखविली.
काही दिवसांपूर्वी यूपी’चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केलं होत की,’जे लोक राम जन्मभूमी आंदोलनाला विरोध करायचे, त्यांच्या तोंडून आता मंदिराचा विषय निघतो. हा एक कट असू शकतो. त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं, थोडे दिवस धीर धरा, अयोध्येत राम मंदिर नक्की होईल’. त्यावेळी आदित्यनाथ यांनी संत समुदायाला संबोधित करणताना थोडा धीर बाळगण्याचं आवाहन केलं होत. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजप स्वतः शिस्तबद्ध राम मंदिराचा मुद्दा तापवण्याच्या तयारीत असून त्यामुळे मतांची भावनिक पेरणी करता येईल असं भाजपला वाटू लागलं आहे.
