जळगाव : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा करताना,’यापुढे भाजप सोबत कोणत्याही निवडणुकीत युती नाही म्हणजे नाही आणि आम्ही यापुढे केवळ स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. परंतु ही घोषणा फुसकी असल्याचे समोर येत आहे. कारण आगामी जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सुद्धा या युतीला सहमती दर्शविली आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका संदर्भातील भाजपची सर्व सूत्र हाती घेतली आहेत. त्यामुळे गिरीश महाजन आणि सुरेशदादा जैन यांनी पहिल्यांदा मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांची या युतीस सहमती असल्याचे नक्की केले. त्यानंतर सुरेश जैन यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन, त्यांच्याकडे भाजप आणि शिवसेना युतीसाठी मान्यता घेतली आणि त्यांची सुद्धा सहमती मिळाल्याचे वृत्त आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात आता भाजप आणि शिवसेना युतीचा तिढा संपला असून केवळ जागावाटपाचा तिढा शिल्लक आहे. त्यामुळे शिवसेना कितीही स्वबळाच्या गर्जना करत असली तरी जेव्हा प्रश्न सत्तेच्या मलईचा येतो, तेव्हा मात्र सर्व तलवारी म्यान करून ‘ही दोस्ती तुटायची न्हाय’ असच सर्व काही आलबेल असल्याचं दाखवलं जात.
