मुंबई : जन्माष्टमीची रात्र सरली असून आज सकाळपासून दहीहंडीचा जल्लोष मुंबई ठाण्यात जोरदार सुरु झाला आहे. मागील २ वर्षे सार्वजनिक दहिकाल्यावर न्यायालयाच्या नियमावली लागू झाल्याने अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली होती. असे असले तरी सुद्धा दहीहंडी उत्सवाचा आणि दहीहंडी पथकांचा आनंद कमी झालेला नाही.
अनेक दहीहंडी पथक मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने रवाना झाली आहेत. आज दिवसभर सर्वच वाहिन्यांवर या दहीहंडी पथकांचा थरार सुरु असणार आहे. परंतु न्यायालयाच्या नियमावलीप्रमाणे सुरक्षेची हमी जवाबदारी आयोजकांवर असल्याने ते दडपणसुद्धा असणार आहे. तरी अनेक आयोजकांनी सुरक्षेची काळजी घेतल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे. अनेक ठिकाणी लाखोंची बक्षीस जाहीर करण्यात आली आहे.
त्यात सुद्धा निवडणुकीचा काळ जवळ येत असल्याने अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात येईल अशी शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध दहीहंडी पथक आणि नोयोजनबद्ध दहीहंडी फोडण्याची कला आणि सराव आज सर्वांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस दहीहंडी पथकांचा असेल यात काहीच शंका नाही.
