मुंबई : एल्फिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरी दुर्घटनेत अनेक मुंबईकरांनी त्यांचे प्राण गमावले होते. आज त्याच दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मुंबईकरांच्या आयुष्यातील ती एक न विसरता येणारी अत्यंत दुःखद घटना होती. आजही ती घटना आठवली तरी मृतांच्या नातेवाईकांचे डोळे पाणावतात. त्या घटनेला एक वर्ष झाल्याच्या कारणाने मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रभादेवी स्थानकाजवळ सकाळी शेकडो मुंबईकर तसेच मृतांचे नातेवाईक आले होते. त्यावेळी एकाबाजूला संबंधित ठिकाणी पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सेल्फी-शो जोरात सुरु असल्याचे पाहून मृतांचे नातेवाईक तो संताप डोळ्यात साठवत होते.
आपल्या कुटुंबातील मृतांचे फोटो नजरेसमोर दिसताच डोळे पाणावलेले नातेवाईक आणि सेल्फीसेशनमध्ये मग्न झालेले शिवसैनिक, असे उद्विग्न करणारे चित्र आज तिथे दिसून आले. त्या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरजवळ उभे राहून फोटोसेशन करण्यासाठी शिवसैनिकांची लगबग दिसून येत होती. हे पाहिल्यानंतर ‘देवा, यांना थोडी अक्कल दे’ असेच उद्गार आपसूक येत होते. आपण कुठे आणि कोणत्या क्षणाला कसे वागत आहोत याचं भान त्या स्थानिक शिवसैनिकांना अजिबात नव्हतं.
शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिकही जमले होते. या दुर्घटनेत मृत “मीना दिगंबर वाल्हेकर” यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॅनर लावण्यात आला होता. नेमका याच बॅनरजवळ शिवसैनिक रांग लावून फोटोसेशन करत होते. काही शिवसैनिकांच्या चेह-यावर तर गप्पा मारताना हसूही दिसत होते. त्यात शिवसेनेच्या शिवडी उपशाखा संघटक कवीता कोकरे या चक्क सेल्फी काढताना दिसल्या. या दृश्यामुळे श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांच्या आणि नागरिकांच्या भुवयाही उंचावल्या. पण सेल्फी काढण्यात दंग असलेल्या कार्यकर्त्याचे यांच्याकडे लक्षच गेले नाही. अतिउत्साही शिवसैनिकांच्या या असंवेदनशीलपनाबद्दल संताप व्यक्त केला जात होता.
