मुंबई : मागील दोन आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दार सातत्याने वाढत आहेत. परिणामी वाहतूक खर्च वाढत असल्याने त्याचा थेट फटका भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंना सतत बसत आहे. भाज्यांचे दरा तर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने गणेश भक्तांना गणेशमूर्तींपासून पूजासाहित्यापर्यंत सर्वच खरेदीसाठी खिसा जाळावा लागत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या घरोघरी पैशाची चणचण जाणवत आहे.
अगदी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन पूजासाहित्य सामुग्रीचा विचार केल्यास कापूर, कापसाच्या वाती, अगरबत्तींचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले पाहायला मिळत आहे. तर कापराचे दर प्रति पाव किलोमागे तब्बल १०० रु.इतके प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे पाव किलो कापरासाठी आता २५० ते ३०० रुपयांपासून ते थेट ४०० रु.पर्यंत दर सांगितला जात आहे. कापूर ज्वलनशील वस्तू असल्याने त्यावर एकूण १८ टक्के इतका जीएसटी लागतो. परणामी त्याची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरीकडे पूजेसाठी महत्वाच्या अशा अगरबत्तीचे दर सुद्धा ४०० रुपये किलो ते १००० रुपये किलोच्या दरम्यान दिसून येत आहेत. अगरबत्तीवर सुद्धा ५ टक्के जीएसटी लागू होतो. मागील वर्षी ३०० रुपयांना मिळणारा अगरबत्तीचा पुडा यंदा ५०० ते ५२५ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर एखादा पूजेचा संपूर्ण संच जरी घ्यायला गेलं तर ते सुद्धा २५० ते ३०० रु. वरून ५० ते १०० रु.नी महागल्याने सामान्य लोकं बाजार करताना पुरते हैराण झालेले पाहायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे गणेशवस्त्रांच्या किमतीही यंदा ,अथय प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांनी मूर्तीचा आकार, मूर्तीवरील कलाकुसर, मखर यामध्ये थोडीशी कपात करून खर्चावर नियंत्रण करण्याचे प्रकार अवलंबले आहेत. सर्वाधिक दैनंदिन पूजेचे साहित्य ही त्यांची प्राथमिक गरज असल्याचे पाहावयास मिळत आहे. परंतु बाप्पाच्या पूजेच्या साहित्यात कपात कशी करणार अशी खंत सुद्धा अनेक भक्तांनी बोलून दाखवली.
दुसरीकडे महागाईमुळे रोजच्या जेवणात लागणाऱ्या भाज्यांचे भाव सुद्धा प्रचंड वाढले आहेत. त्यात घाऊक बाजारात येणाऱ्या मालामध्ये चांगली गुणवत्ता असलेल्या भाज्यांचे प्रमाण कमी झाल्याने, ज्या चांगल्या भाज्या किरकोळ विक्रीसाठी नेल्या जातात, त्यांचे मूळ प्रमाण घटल्याने किरकोळ विक्रेते त्या वाढीव दराने विकत आहेत असं निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे मखर ते कांदे, सामान्यांसाठी सगळ्याचेच वांदे! असच म्हणावं लागेल.
