नवी दिल्ली : मुंबईतील किसानमोर्चा यशस्वी झाल्यानंतर आता किसानमोर्चा दिल्लीच्या दिशेने नव्या आंदोलनाचा एल्गार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी देशभर करोडो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत.
येत्या ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी संपूर्ण देशभरातील करोडो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत. त्यासाठीच किसनमोर्चा ९ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे. मुबईतील मोर्चा थेट विधानसभेवर येऊन थडकला होता आणि त्याची देशभर चर्चा झाली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या वेदना दिल्लीपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय किसान महासभेने ठरवले आहे.
त्यानिमित्ताने दिल्लीत अखिल भारतीय किसान महासभेच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. त्या बैठकीला अजित नवले आणि डॉ. अशोक ढवळे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारदरबारी पोहोचवण्यासाठी अजून खूप मोठी झेप घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठीच देशभरात शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचून दहा करोड शेतकऱ्यांच्या सह्यांचे लेखी निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येईल.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव आणि संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागण्या असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
