राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडणार आहेत. लोकपाल तसेच कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती दिवशी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा मोदी सरकारला इशारा दिला आहे. राज्य भाजपच्या अनेक दिग्गज नेते मंडळींनी यावर तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, मात्र अण्णांनी माघार घेणार नसल्याचं कळवलं आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकपाल बाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा अण्णांनी निर्धार केल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढणार यात शंका नाही. येत्या २ ऑक्टोबरपासून अण्णा राळेगणमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, तरी दिल्ली तसेच देशातील अन्य अनेक ठिकाणी अण्णांच्या चाहत्यांनी आंदोलनाची जोरदार तयारी चालविली आहे.

आधीच महागाईमुळे भाजपच्या विरोधात वातावरण तयार होतं आहे. त्यात अण्णांचं आंदोलन भाजपला अजून अडचणीत आणू शकत. यापूर्वीच्या सरकारनं अण्णांच्या पत्रांना उत्तर देण्याचं सौजन्य दाखविलं आहे. अण्णांच्या जंतरमंतरवरील आंदोलनामुळं सरकारला बॅकफुटवर जावं लागलं होत. लोकपालांची नियुक्ती, लोकायुक्तांची नियुक्ती, भ्रष्टाचारविरोधी कायदा आदींबाबत सरकारला काही पावलं वेळीच उचलावी लागली होती हे ध्यानात घ्यायला हवं.

anna hazare to start hunger strike aginst Modi Government