नवी दिल्ली : राफेल करारावरून आधीच चर्चेत आलेले अनिल अंबानी आणि मोदी सरकार पुन्हा नव्या वादात येण्याची शक्यता. कारण अनिल अंबानींच्या मालकीची रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमिटेडकडून आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे.

राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, जर तुमचे जवळचे मित्र पंतप्रधान असतील तर कोणताही अनुभव नसताना तुम्हाला १,३०,००० कोटी रुपयांचं राफेल कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळू शकतो, पण थांबा! इथे अजून काही आहे! जम्मू-काश्मीरच्या ४ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांचे आदेश दिले आहेत, परंतु केवळ रिलायन्स जनरल हेल्थ इन्शुरन्स कडून…… असं ट्विट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर सरकारने कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की, कर्मचाऱ्यांनी केवळ रिलायन्स जनरल हेल्थ इंशुरन्स कंपनी लिमिटेड’कडून ८,७७७ रूपये आणि २२,२२९ रुपये (कर्मचा-यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी) असा वार्षिक प्रीमियमवर आधारित आरोग्य विमा घ्यावा. या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी (राजपत्रित आणि इतर कर्मचारी) कर्मचारी, विद्यापीठे, कमिशन, स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचाऱ्यांनी तो खरेदी करणे अनिवार्य आहे. हे आदेश १८ सप्टेंबर २०१८ रोजी जम्मू-काश्मीर राज्य सरकारकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे.

तसेच भारत सरकारच्या काही आरोग्य योजनांशी सुद्धा या कंपनीला जोडण्याचा प्रकार होत असल्याचे आरोप सुद्धा काँग्रेस कडून करण्यात ये आहे. आधीच राफेल करारावरून मोदी सरकार अडचणीत असताना रिलायन्सच्या आरोग्य विम्याच्या माध्यमातून भाजपच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

rahul gandhi attacks pm narendra modi on giving health insurance deal to anil ambani