मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा निकाल आणि भाजपच्या पीछेहाट होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ५ राज्यांमधील निकालांवर मत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या जुलमी राजवटीला ही मतदाराने दिलेली चपराक आहे, अशा तिखट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे सविस्तर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘पहिल्यांदा मोदींच्या होमग्राऊंडमध्ये त्यांना जागा दाखवणारे गुजरात हे पहिले राज्य होतं. त्या निवडणुकीदरम्यान झालेले मतदान आणि आता झालेल्या मतदानावरून भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा समजली आहे. त्यावेळी गुजरातमध्ये १६५ जागा येणे गरजेचं होतं पण प्रत्यक्षात तिथे ९९ जागा आल्या होत्या. उर्जित पटेल यांनी भविष्यातील कुठल्या तरी मोठ्या संकाटाआधी राजीनामा दिला, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू-पप्पू म्हणून हिणवणाऱ्या भाजपाला सध्या राहुल गांधी ‘परम-पूज्य’ झाले आहेत असं सुद्धा खोचकपणे सांगून राज ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.
