नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या लाटेत काँग्रेस’सकट देशभरातील सर्वच विरोधकांचा सुपडा साफ झाला. मात्र त्यानंतर अनेक पक्षांचं राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखच धोक्यात आली आहे. लोकसभेतील पराभवानंतर आता निवडणूक आयोग देखील भारतीय जनता पक्षाच्या सर्व विरोधी पक्षांना धक्का देण्यास सज्ज झाला आहे असं म्हटलं जात आहे. इतर पक्षांप्रमाणे हा धक्का शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देखील बसणार आहे. कारण आयोगाने अनेक पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. अशा पक्षांमध्ये एनसीपीचा देखील समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस आणि एनसीपीला भारतीय जनता पक्षाच्या बलाढ्य आव्हानासमोर झुकावे लागले. एकूण २४ मतदारसंघातून राष्ट्रवादीला केवळ ५ जागा मिळवता आल्या होत्या तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. तर अनेक मतदारसंघातील अस्तित्व देखील धोक्यात आले. त्यामुळे नुसत्या नावाचा गवगवा असणाऱ्या पक्षांचे राष्ट्रीयत्व निवडणूक आयोग काढून घेणार आहे.
आयोगाने राष्ट्रवादीला आज रीतसर नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीसवर राष्ट्रवादीला २० दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न दिल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.
