एकदा माणसाचा जन्म घेतला कि पुन्हा मनुष्यरुपात जन्माला यायला ८४ लक्षयोनीतून जावं लागत असं म्हटलं जातं. ‘माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी’, ‘ह्युमन इस द मोस्ट ब्युटीफुल क्रिएशन ऑफ नेचर’ ही आणि अशी अनेक वाक्य आपण मनुष्य रुपात जन्माला आल्या नंतर ऐकतो. सुरुवातीच्या काळात, शाळेत असताना किंवा इतर वेळीही ही वाक्य ऐकली कि काय आपलं भाग्य महान कि आपण मानव म्हणून जन्माला आलो असं वाटणं हे सहाजिकच आहे.. पण जसं जगाचा अनुभव घ्यायचं क्षेत्र वाढत गेलं तसं माणसानेच स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेल्या काही गोष्टी कळायला लागल्या, त्यांचा द्वेष वाटू लागतो..
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जात. जात जात म्हणजे नक्की काय असतं? पूर्वीच्या काळी जाती पाती ठरविल्या होत्या ते एका विशिष्ट कारणासाठी. पूर्वी प्रत्येकाला आपला व्यवसाय काय आहे हे सांगता यावं म्हणून जातींची मुळात निर्मिती झाली होती. सोनं विकतो तो सोनार व चपला विणतो तो चांभार किंवा पौरोहित्य करतो तो पुरोहित किंवा ब्राह्मण. पण माणसाने जात ह्या शब्दाचा आताच्या काळात इतका मोठा गैरसमज करून घेतला आहे, कि त्या जातीचा तो माणूस आहे हे म्हटलं कि तोसुद्धा इतरांसारखाच असणार.
उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती ब्राह्मण घरात जन्माला आली, वाढली पण म्हणून ती व्यक्ती ब्राह्मण होते असे नाही. ब्राह्मण ह्या शब्दाचा मुळात अर्थ काय, तर ‘ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः’, ज्याला संपूर्ण विश्वाचे ज्ञान आहे, जो पूर्ण संसाराचे सार जाणतो असा तो ब्राह्मण. पण हे समजून न घेता ती व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणजे तिने अमुकच वागलं पाहिजे आणि तिचा स्वभाव तसाच असला पाहिजे ह्याबाबत लोकांच्या अपेक्षा असतात. पण हे योग्य आहे का? माणसाच्या जातीवरून कधी माणसाचा स्वभाव किंवा वागणूक ठरत असते का? तर नाही, आताच्या काळातील कित्येक ब्राह्मण, ब्राह्मण ह्या शब्दाची लाज राखतील असे वागत नाहीत. तरी सुद्धा त्यांचे वागणे उच्च व दुसऱ्या जातीच्या माणूस कितीही सृजन असला तरी तो वाईट कारण तो उच्च जातीचा नाही.
जातीपातीवरून माणसाची वृत्ती ठरवणे हे केव्हाही चुकीचेच आहे. पण जातीमुळे किंवा धर्मामुळे एखाद्यासोबतच्या वागणुकीत खरच फरक पडतो? ती व्यक्ती मुसलमान आहे म्हणून केवळ त्याचा द्वेष करणे किंवा तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याच्या विषयी वाईट बोलणे….हे कितपत योग्य आहे आणि हे अजून किती काळ चालणार? माणसाची वृत्ती ही त्याच्यावर झालेल्या संस्कारांचे पडसाद असतात, ती त्याच्या जातीमुळे चांगली वा वाईट झालेली नसते. त्याची उच्चनिच्चता ही त्याच्या वर्तनातून घडत असते हे लोकांना कळायला हवे.
काही जण फक्त बोलताना बोलतात कि आम्ही जातपात किंवा असे पुरोगामी विचार मानत नाही, पण हेच लोक एका मराठी मुलीने मुसलमानाशी लग्न केलं कि त्याला नावे ठेवतात. मग प्रश्न पडतो कि हा देखावा कशासाठी? आम्ही किती मॉडर्न आहोत हे समाजाला दाखविण्यासाठी कि स्वतःच्या मनाला सांगण्यासाठी. माणसाने माणसाशी माणसासमान वागावे ही फक्त आता तोंडची वाक्ये राहिली आहेत आणि हा जातींचा खेळ माणूस तसाच स्वार्थीपणे खेळतो आहे….
धन्य तो माणूस आणि धन्य त्या जाती…
लेखक – श्रुती जोशी
