पुणे: अरणेश्वर येथील टांगेवाले वसाहत येथे संतप्त नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेधाच्या घोषणा देत ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप केला. टांगेवाले वसाहत येथे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
पुण्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सरकारी यंत्रणा मदतीसाठी उशिरा आली, नागरिकांची तक्रार आहे. या आपत्तीमध्ये नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पालकमंत्रीच शहरात नाही, अशी लोकांची भावना होती. नागरिकांच्या या रोषाचा आज चंद्रकात पाटील यांना सामना करावा लागला. टांगेवाला कॉलनी येथे ते पाहणी करण्यासाठी गेले असता, नागरिकांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले. यादरम्यान त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काही लोक राजकारणासाठी असे प्रकार घडवून आणतात. पण ही वेळ राजकारणाची नाही, तर खांद्याला खांदा लावून लढण्याची आहे, असे ते म्हणाले. शहरातील अरण्येश्वर , सहकारनगर, पर्वती, धायरी, वडगाव यांसारख्या भागात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.या दुर्घटनेत शहरात १४ बळी गेले असून काही जण बेपत्ता आहेत.गेल्या २ दिवसांपासून येथील नागरिक आपतकालीन संकटांशी संघर्ष करत आहे.
पण पुणे महापालिकेच्या प्रशासनाकडून अपेक्षित मदत येथील पूरग्रस्त कुटुंबाना मिळालेली नाही. तसेच त्यांचे वीज प्रवाह आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले. मदत न देता फक्त फोटो काढायला आल्याचा आरोप पुरग्रस्त नागरिकांनी केला. तसेच भाजप सरकार , पुणे महापालिका आणि पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवणाऱ्या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर पाटील यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी कुठलाही प्रतिसाद न देता त्यांना विरोध केला.
