ठाणे: मागील काही वर्षांपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्रसाठी आक्रमक आंदोलनं करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे टोलमुक्त (Toll Freee) आंदोलनाची सुरुवात मुळात मनसेनेच केली होती आणि त्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर ७० पेक्षा अधिक टोलनाके बंद देखील झाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैत्रुत्वात मनसेने ९ नोव्हेंबर रोजी टोलमुक्ती करण्यासाठी आनंदनगर टोलनाका ते कोपरीपुलापर्यंत मानवी साखळीचे आयोजन केले होते. परंतु, अयोध्या निकालामुळे पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्याने आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी ठरल्याप्रमाणे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी मानवी साखळीचे आयोजन केले होते.

ठाण्यातील आनंदनगर येथील टोलनाक्यावर MH 04 या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी मनसेने मानवी साखळी करून सरकार आणि प्रशासनाविरुद्ध आंदोलन केलं. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून कोणत्याही प्रकारे टोल वसूली केली जाणार नाही, असे जाहीर घोषणा केली होती. परंतु, अजूनही ठाणेकरांकडून टोल घेणे सुरूच असून आमदार संजय केळकर जनतेशी खोटं बोलून ठाणेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी केला होता.

त्यानतंर त्याच आंदोलनाचा दूसरा टप्पा म्हणून आनंदनगर टोल येथे मनसे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. दररोज कामानिमित्त ठाण्यातून मुंबईत आणि पुन्हा मुंबईतून ठाण्यात परतणाऱ्या ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे ठाणेकरांमध्ये नाराजी आहे. ठाण्यातील वाहनांना टोलपासून मुक्ती मिळावी अशी मागणी वारंवार होत होती. यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून टोलमुक्तीसाठी प्रयत्नही झाले होते. तरीही टोलमुक्ती मिळाली नसून आता टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

विशेष म्हणजे टोल-फ्री महाराष्ट्राचं आश्वासन देणारे उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने शिवसेनेवर या विषयाला अनुसरून दबाव वाढणार यामध्ये शंका नाही आणि त्यात जर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेल्यास शिवसेनाच राजकीय कात्रीत सापडेल असं सध्या या विषयाचं स्वरूप आहे.

टोल फ्री ठाण्यासाठी मनसेचं आंदोलन; उद्धव ‘ठाकरे’ सरकारवर दबाव वाढणार