मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.

त्यामुळे वाढत्या महागाईमुळे हैराण झालेल्या सामान्यांनी मोदी सरकारवर प्रचंड रोष व्यक्त केला असून आम्ही या सरकारला चांगलाच धडा शिकवू असं सांगताना सरकारला धारेवर धरलं आहे. ऐन सणासुदीत महागाईचा फटका बसत असल्याने सामन्यांमध्ये मोदींनी आम्हाला फसवल्याची भावना व्यक्त केली आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढ कुठल्याही परिस्थितीत थांबताना दिसत नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होताना दिसत आहे.

सलग अकराव्या दिवशी सुद्धा वाढ होत आहे. मुंबईत आज पेट्रोल ८७.३९ तर डिझेल ७६.५१ रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोलचे दर आज ४८ पैशांनी तर डिझेलचे दर ५५ पैशांनी वाढले आहेत. पेट्रोलची दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामन्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. मालवाहतूक वाढल्याने महागाईचा फटका नागरिकांना बसत आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने गोरगरिबांचे अर्थकारण कोलमडल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे कारण पुढे करीत तेल कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावला आहे, परंतु त्यातून सामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही हालचाली करत नसल्याचं सामान्यांचं ठाम मत आहे.

Petrol rates are increasing on eleventh days but no solution from Modi government