नवी दिल्ली : आज ८ नोव्हेंबर २०१८ या दिवशी नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना अचानक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरवून एकूण चलनातील ८६ टक्के चलन बंद करीत असल्याची जाहीर घोषणा केली होती. त्यावेळी वाढत्या काळ्या पैशाला म्हणजे ‘ब्लॅक मनी’ला आळा घालण्यासाठी तो निर्णय घेतल्याचे मोदींनी देशातील जनतेला सांगितले होते. परंतु, मोदींचा तो ‘ब्लॅक मनी’ संपविण्याचा दावा अखेर एका सर्वेक्षणातून खोटा ठरला आहे.
दरम्यान, या सर्वेक्षणात तब्बल ६० टक्के देशवासीयांनी काळ्या पैशाचे पूर्णपणे निर्मूलन झाले नसून मोदींचा नोटबंदीचा निर्णय फसवा असल्याचं म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सामान्यांनी जर हे मत व्यक्त केलं असेल तर ती मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. तसेच मोदींच्या काळात काळ्या पैशाची निर्मिती वाढत असल्याचे मत देशवासीयांनी व्यक्त केले आहे. ‘लोकल सर्कल’च्या एका सर्व्हेक्षणात हा मुद्दा स्पष्ट झाली आहे. दरम्यान, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर काळे पैसे दडवलेल्यांची धावपळ झाली असली तरी, मोदींच्या काळात सुद्धा पुन्हा देशातील काळ्या पैशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, एकूण बाजारातील चलनी नोटांचे प्रमाण सुद्धा वाढल्याचे निरीक्षण नागरिकांनी मांडले आहे. ‘लोकल सर्कल’ने भारतातील एकूण २१५ जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या या सर्व्हेक्षणात १५,००० जणांनी सहभाग घेतला होता.
सर्वेक्षणातील निष्कर्ष
काळ्या पैशाचे प्रमाण वाढले आहे काय?
होय वाढले आहे – ६० टक्के
वाढलेले नाही – १७ टक्के
तेवढेच आहे – १६ टक्के
माहीत नाही – ७ टक्के
(एकूण मते ७,८९४)
