नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार-२ च्या पहिला अर्थसंकल्पात सामन्यांसाठी आणि उद्योगांसाठी नेमकं काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित झालं आहे. त्यात भर म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. पुढील आर्थिक वर्षात देशाचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज देखील काल आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना सीतारामन यांनी व्यक्त केला.

अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची नेहमीची प्रथा आहे. परंतु यंदा ही प्रथा पूर्णतः बदलण्यात आली आहे. सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. सीतारामन यांच्याकडे पाश्चिमात्य पद्धतीची ब्रिफकेस नसल्यानं सर्वानाच आश्चर्य वाटलं. त्यामागील कारण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी सांगितलं. ‘अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे,’ असं सुब्रमणियन म्हणाले.

आपण आता गुलाम नाही, आणि आपण आपल्या स्वतःच्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत हे देखील सीतारामन यांनी कृतीतून दाखवून दिल्याचं मुख्य आर्थिक सल्लागारांनी सांगितलं. पाश्चात्यांच्या गुलामीतून आम्ही बाहेर पडलो आहोत, हे सीतारामन यांनी दाखवून दिलं आहे, असं सुब्रमणियन म्हणाले. सीतारामन अर्थसंकल्प घेऊन सकाळी अर्थ मंत्रालयात पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

ब्रिफकेस गेली, कारण अर्थसंकल्पाला आपण ‘चोपड्या’ म्हणतो: कृष्णमूर्ती सुब्रमणियन