नवी दिल्ली : ‘कलम ३७० हटवल्यानंतर आता आपल्या नोकऱ्या व जमिनी जातील, ही भीती जम्मू-काश्मीरच्या जनतेत पसरली आहे. मात्र, ती अनाठायी असून, देशाची एकता राखण्यासाठी ते कलम हटवणे आवश्यक होते. त्यामुळे तेथील जनतेच्या नोकऱ्या व जमिनी जाणार नाहीत, तसा विश्वास त्यांच्यात पुन्हा निर्माण करू,’ असे आश्वासन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले.

भागवत यांनी मंगळवारी काही परदेशी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संघाची विचारसरणी व कार्यांसंबंधी माहितीही त्यांना दिली. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य, डॉ. कृष्ण गोपाल, उत्तर क्षेत्राचे संघचालक बजरंग लाल गुप्त, दिल्ली प्रांताचे संघचालक कुलभूषण आहुजा या वेळी उपस्थित होते.

यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला आरएसएसचा पाठींबा असल्याचे भागवत यांनी सांगितले. या विधेयकामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील जे हिंदू आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्याचा प्रस्ताव आहे. भारताशिवाय या हिंदूंना जगात इतरत्र कुठेही जागा नाही, त्यामुळे या विधेयकाला पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गाईच्या नावाने होत असलेल्या मॉब लिचिंगच्या घटनांचा यावेळी भागवत यांनी निषेध केला. संघ सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करतो. जर यामध्ये कोणताही संघ स्वयंसेवक दोषी आढळला तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

RSS साठी प्रत्येक भारतीय हिंदूच : मोहन भागवत