नवी दिल्ली : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. ६ मे रोजी युपी, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ६ प्रमुख राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान यामध्ये उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा समावेश आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीमधून आणि रायबरेलीतून संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी लढत आहेत. अमेठीमधून भारतीय जनता पक्षाच्या स्मृती इराणी आणि रायबरेलीतून भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांना अनुक्रमे मैदानात उतरवण्यात आले आहे. दिनेश प्रताप सिंह यांनी नुकताच काँग्रेसमधून बाहेर पडत भाजप प्रवेश केला आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि रालोद यांच्या महाआघाडीचा उमेदवार रायबरेलीत उतरवण्यात आलेला नाही. या लढती काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. राहुल गांधी यांनीही एक भावनिक पत्र लिहून अमेठीच्या जनतेला भावनिक साद घातली आहे.
राजस्थानातील उर्वरित सर्व १२ जागांवर मतदान होणार आहे. राजधानी जयपूर ग्रामीण येथून भाजपतर्फे केंद्रीय मंत्री आणि नेमबाज राजवर्धसिंह राठोड रिंगणात आहेत. जोधपूर येथून गजेंद्र सिंह शेखावत, बाडमेर येथून कैलाश चौधरी, बीकानेर येथून अर्जुन राम मेघवाल, चितौडगढमधून सी. पी. जोशी भाजपचे उमेदवार आहेत. तर, शेखावत यांच्याविरोधात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत, बाडमेर येथे कैलाश चौधरी यांच्या विरोधात ज्येष्ठ काँग्रेस नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह हे आहेत. नेमबाज राजवर्धनसिंह राठो़ड यांच्या विरोधात काँग्रेस नेते कृष्णा पुनिया उभे आहेत. उदयपूरमध्ये भाजपकडून अर्जुनलाल मीणा तर काँग्रेसकडून रघुवीर सिंह मीणा मैदानात आहेत. या सर्व लढती महत्वाच्या मानल्या जात आहे.
