मुंबई: देशाच्या राजकारणाला महाराष्ट्रातील महाविकासआघाडीच्या निमित्ताने कलाटणी मिळाली आहे. या महाआघाडीने मोदी-शहा जोडीला अक्षरशः नामोहरम करून सोडले आहे. त्यात महत्वाची भूमिका बजावली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे सर्वश्रुत आहे. मात्र महाराष्ट्रात सत्तापालट करण्यात यश आलेलं असताना आता गोव्याच्या राजकरणात नवी आघाडी जन्माला येणार आहे असं स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

गोव्यात देखील दडपशाहीतून सरकार स्थापन करण्यात आल्याचा आरोप याआधीच काँग्रेसने केला आहे. मात्र आता तिकडे देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याची योजना आखात आहेत असं वृत्त आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सूचित केलेल्या राजकीय घडामोडीतून नेमकं काय घडणार यावर सर्वाचं लक्ष आहे.

लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भारतीय जनता पक्षाचं सरकार घालवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. गोव्यात सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत.

“गोव्यामध्ये नक्की भूकंप होईल. विजय सरदेसाई त्यांच्या सर्व आमदारांसोबत आहेत. त्यांच्यासोबत चार आमदार आहेत. सरकारला पाठिंबा देणार आमदारही आमच्यासोबत आहेत. सुधीन ढवळीकरांसोबत बोलणं झालं आहे. सरकारसोबत असलेल्या प्रमुख लोकांशी बोलणं झालं आहे. हे सरकार अनैतिक पायावर बनलेलं आहे. लवकर इथे हालचाली पाहायला मिळतील,” असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

गोव्यात देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार?