नवी दिल्ली: जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस, एम्स तसेच दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले असून, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा संस्थेसमोर एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शरद पवार, आनंद महिंद्रा आणि आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून जेएनयूतील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हिंसाचाराची जी दृष्ये समोर आली आहेत ती भीतीदायक आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित असण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. राजकारण, विचारधारा कोणतीही असो, जर तुम्ही भारतीय असाल तर अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेता कामा नये. हल्ला करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी महिंद्रा यांनी केली.

 

Web Title:  Students Protest in Mumbai and Pune against violence at Delhi JNU on Sunday Night.

‘जेएनयू’ हल्ल्याचे पडसाद; देशभरात विद्यार्थ्यांची निदर्शने