मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे. एन निवडणुकीच्या काळात मतदानापूर्वी विशिष्ट पक्षाच्या हितासाठी काही पोल्स सार्वजनिक करण्याच्या सपाटा लावला जातो. मतदार देखील अशा पोल्समुळे प्रभावित होण्याची शक्यता अधिक असल्याने विरोधकांनी अनेकवेळा यावर लक्ष केंद्रित करण्याचे निवडणूक आयोगाला कळविले होते.

त्यात काही ठराविक प्रसार माध्यमं सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याचा आरोप अशा पोलवर समाज माध्यमांनी नेहमीच केला आहे. तसेच यावर बंदी असताना देखील काही प्रसार माध्यमं सर्व नियम धाब्यावर बसवून ते दाखवत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं आहे आणि यावर लक्ष घालून लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं मत व्यक्त केलं होतं.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास ही मनाई असणार आहे. तसेच मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही बंदी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण आयोजित करण्यास किंवा वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान, मतदान संपण्याच्या वेळेआधी ४८ तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनियन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दरबारी प्रसार माध्यमांना दणका! निवडणूक काळात एक्झिट आणि ओपिनियन पोलवर बंदी