नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान महाराष्ट्रात सरकारला सदर प्रकरणी पुढील २ आठवड्यात उत्तर देण्याचे थेट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असून मराठा आरक्षणाला तूर्तास तरी स्थगिती देण्यात अली नसल्याने संपूर्ण मराठा समाजाचा आणि महाराष्ट्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाला विठ्ठल पावला अशी प्रतिक्रीया देत आम्ही खूश असल्याचे ट्विटरवरून त्यांनी सांगितले आहे. तसेच मराठा समाजाची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांचे देखील जाहीर अभिनंदन केले आहे.

याचबरोबर संभाजीराजे म्हणाले, “आरक्षणाचा निकाल ऐकायला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची पायरी चढली. शाहू महाराजांना अपेक्षित बहुजनांना एकत्र करणारा निकाल लागेल असा विश्वास आहे. महाराष्ट्र सरकार ने देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली आहे. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विश्वास वाटतो, ‘आरक्षण’ टिकेलच.”

मुंबई उच्च न्यायालयाने २७ जून रोजी मराठा आरक्षण वैध असल्याचे सांगत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा मार्ग समाजाचा कायदेशीर मार्ग मोकळा केला होता. परंतु, मराठा आरक्षणाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. केवळ राजकीय फायद्यासाठी आणि निवडणुका डोंळ्यासमोर ठेवून नियमबाह्य स्वरुपात दिलेले एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी संबंधित याचिकेत करण्यात आली होती.

पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! : खासदार संभाजीराजे