मुंबई: विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य करुन दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते काल एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखत त्यांनी युतीबद्दलच्या शक्यता आधीच वर्तवल्या आहे.

लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भारतीय जनता पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचं, तसेच विधानसभेला शिवसेनेला १४४ म्हणजेच निम्म्या जागा देण्याचं आश्वासन त्यावेळी भाजपने दिलं होतं. त्यामुळे जर शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, युतीची चर्चा मागील काही दिवसांपासून थांबवल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून मिळाली आहे. तत्पूर्वी युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे, त्यात शिवसेना विश्वासघात करणार नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिल्याने युतीची चर्चा पुढे सरकली नाही. शिवसेनेला जास्तीत जास्त १२० जागा सोडण्याचा भाजपाचा इरादा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील त्यावर बारीक लक्ष असल्याचं समजतं. त्या अनुषंगाने मनसेने देखील जोरदार आखणी सुरु केल्याचे वृत्त आहे आणि त्यासंबधीत जिल्हा निहाय बैठका सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ६३ मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अनुकूल आहेत. त्यामध्ये मनसेचे उमेदवार पहिल्या ३ क्रमांकांत राहतील, असा पक्षाचा अंदाज आहे. त्या संबंधित विस्तृत अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. त्याआधारे राज ठाकरे संबंधित मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत असल्याचे वृत्त आहे.

विधानसभा निवडणूक लढवायचीच, असा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्यांनी अशी भूमिका राज ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे. राज ठाकरे याबाबत येत्या दोन दिवसात घोषणा करण्याची शक्यता आहे. मनसेचा निर्णय युती किंवा आघाडीवर अवलंबून नसेल. राज ठाकरे यांनी होकार दिल्यास निवडणूक लढण्यास आम्ही सज्ज आहोत,’ असे पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले. पुण्यात पक्षाचे संघटन मजबूत आहे. दर मंगळवारी साप्ताहिक बैठका होत असून, त्यात आढावा घेतला जात आहे. मनसेकडे कार्यकर्ते आणि उमेदवारही सज्ज असून राजसाहेबांचा आदेश आल्यानंतर पुढील दिशा निश्चित होईल असं पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

युती-आघाडीकडे दुर्लक्ष करत राज ठाकरे दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता