मुंबई : नरेंद्र मोदी हे एडॉल्फ हिटलरची कॉपी करत आहेत असा घणाघात राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केला. तसेच जर त्यांच्याविरोधात तोंड उघडलं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं ही हिटलरचीच मूळ संकल्पना आहे याची त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली. त्याचाच कित्ता सध्या नरेंद्र मोदी गिरवत आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच २०१४ देशाला दाखवलेली ‘अच्छे दिन’ ही मूळ संकल्पना अमेरिकेतील रूझवेल्ट यांच्या वडिलांची आहे ज्यांनी “Happy Days will come” असा नारा त्यावेळी दिला होता. आता नरेंद्र मोदींनी नेमकी त्यांचीच कॉपी केली आहे, असा आरोप राज ठाकरेंनी भर सभेत केला.
याचवेळी भाषणा दरम्यान राज ठाकरेंनी मोदी कसं खोटं बोलत याचे पुरावेच सभेत सादर केले. दरम्यान देशाने मोदींना बहुमत देऊन त्यांना उत्तम संधी दिली होती. परंतु, या संधीचं रूपांतर त्यांना करता आलं नाही असं देखील राज ठाकरे म्हणाले. सत्ताकाळात मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला आणि मोठी जाहिरातबाजी देखील केली होता. तो कसा खोटा आहे ते दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी एक व्हिडिओच पुरावा म्हणून सादर केला आणि त्यातील मुख्य कलाकाराच्या तोंडून याच योजनेतील वास्तव देशासमोर मांडलं.
त्यासाठी डिजिटल व्हिलेज म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाचं उदाहरण दिलं होतं. तिथला आढावा राज ठाकरेंनी सादर केला आणि तिथलं हेल्थ सेंटर, तिथे वायफाय आहे का? या सगळ्याचा आढावा सादर केला. या गावात जागोजागी टॉवर लावले आहेत मात्र या ठिकाणी वायफायला रेंजच नाही असा आरोप राज ठाकरेंनी व्हिडिओ आढाव्याद्वारे केला. डिजिटल काय आहे? हेच आम्हाला माहित नाही असं उत्तर गावकऱ्यांनी दिलं आहे. स्वाईप मशीनही अनेक ठिकाणी अनेक दुकानांमधून मिळाली नाहीत. एवढंच काय अनेकांकडे एटीएम कार्ड नाही, बँकेने कार्ड दिलं नसल्याचंही व्हिडिओत गावकऱ्यांनी म्हटलं आहे. काही गावकऱ्यांकडे मोबाईलही नाही आणि मोदींनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा कसा केला? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. हरिसालची जाहिरात काय केली होती आणि परिस्थिती काय आहे हे राज ठाकरेंनी सांगितले.
केंद्र सरकारच्या जाहिरातीत जो मुलगा आहे तो मॉडेलही मनसेने शोधला. या मुलानेही आपल्याकडे स्वाईप मशीन, पेटीएम, एटीएम कार्ड आपल्याकडे नसल्याचे सांगितले आहे. मी लाभार्थी होय हे माझं सरकार म्हणणाऱ्या मॉडेलकडेही डिजिटल इंडियाच्या काहीही सुविधा पोहचल्या नाहीत असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. यावेळी उपस्थितांनी चौकीदार चोर है अशा देखील जोरजोरात दिल्या. लोकांना किती फसवायचं? किती लुटायचं याला काही मर्यादाच मोदींनी ठेवल्या नाहीत असाही आरोप राज ठाकरेंनी केला आणि पंतप्रधान कसं खोटं बोलत आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
