त्र्यंबकेश्वर: तालुक्यात मागील ४ वर्षांत जलयुक्त शिवारची कामे झाली, परंतु आज तालुकाच जलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. भूजल पातळी खोल गेली असून, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी आणखी ७० ते ८० फुटांनी पाणी खाली गेले आहे. तालुक्यातील विहिरींनी कधीच तळ गाठला असून, आता हातपंपदेखील हतबल झालेले दिसत आहेत. तालुक्यात आठ शासकीय टँकर ३२ वस्त्यांना पाणीपुरवठा करीत आहेत. याशिवाय सामाजिक संस्थादेखील पाणीपुरवठा करीत आहेत.
तालुक्यातील १२४ गावांपैकी ५६ गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. यामध्ये जलसंधारणाची १५५४ कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने वनतळे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, दगडी बांध, चारी खोदणे असे पाणी अडवण्यासाठी कामे करण्यात आली आहेत. असे असतानादेखील भूजल पातळी खालावलेली आहे. तालुक्यातील मोठ्या प्रकल्पांचा पाणीसाठा अल्प म्हणावा इतका कमी झाला आहे, तर लहान बंधारे कधीच कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे गावात सध्या तीव्र दुष्काळाचा सामना करताना स्थानिक लोकं चांगलेच होरपळून निघत आहेत. त्यात जिथे कामं झाली तेथे देखील पाऊस पडून सुद्धा पाण्याचे नियोजन झाले नसल्याने या योजना केवळ पैसे खाण्याचे कुरण बनल्याचा गावकरी आरोप करत आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार जाहिरातीत दाखवत असलेली जलयुक्त शिवाराची स्थिती आणि प्रत्यक्ष वास्तव अत्यंत भीषण असल्याचं समजतं.
तालुक्यात झालेली जलयुक्त शिवारची कामे
वर्ष … गावे….कामांची संख्या
- २०१५-१६… १९ … ८२६
- २०१६-१७… ९ … २३२
- २०१७-१८… ५ … १५०
- २०१८-१९….२२… ३४६
