
Tomato Price Today | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने विक्रमी उच्चांक गाठला आहे, मात्र अजूनही महागाई वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारमधील एकही मंत्री किंवा नेता महागाईबद्दल चकार शब्द काढताना दिसत नाही. मात्र लोकांमध्ये धार्मिक तेढ वाढविण्याची एकही संधी भाजप नेते सोडताना दिसत नाहीत. त्याचं मूळ कारण म्हणजे लोकांना महागाई आणि बेरोजगारी अशा महत्वाच्या मुद्द्यांपासून दूर घेऊन जाणे हाच राजकीय उद्देश असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
दरम्यान, देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. दिल्लीसह देशातील काही भागात टोमॅटोचे किरकोळ दर २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. फ्रेंच बीन्स, फ्लॉवर, कोबी, आले या भाज्यांबरोबरच कांदा आणि बटाट्याच्या किरकोळ दरातही वाढ झाली आहे.
उत्पादक भागात मुसळधार पाऊस
उत्पादक भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. खराब हवामानाचा फटका जमिनीखाली पिकवलेल्या कांदा, आल्यासारख्या भाज्यांनाही बसला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानसह देशाच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बहुतांश भाज्यांचे किरकोळ दर ६० रुपये किलोच्या वर
बहुतांश भाज्यांचे किरकोळ दर ६० रुपयांच्या वर आहेत. भेंडीचा किरकोळ भाव ८० रुपये किलो आहे, तर करडई, लौकी आणि काकडीचा किरकोळ दर ६० रुपये किलो, फ्लॉवर १८० रुपये किलोपर्यंत विकला जातो. गेल्या पंधरवड्यात आल्याचे दर प्रतिकिलो २४० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
मुंबईसह मोठ्या शहरात दर वाढ मोठी
महानगरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कोलकात्यात सर्वाधिक म्हणजे १४९ रुपये प्रतिकिलो असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्याखालोखाल मुंबई १३५ रुपये, चेन्नई १२३ रुपये आणि दिल्ली १०० रुपये प्रति किलो आहे. टोमॅटो आणि इतर भाज्यांचे किरकोळ दर त्यांच्या गुणवत्तेवर आणि विक्रीच्या ठिकाणावर अवलंबून असतात.
किमती लवकरच कमी होण्याची शक्यता नाही
दिल्लीतील आझादपूर भाजी मार्केटचे सदस्य आणि आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी पीटीआयला सांगितले की, “गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील टोमॅटोचा पुरवठा आणखी विस्कळीत झाला आहे. मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास भाव कमी होण्याची शक्यता नाही. सोमवारी दिल्ली आजादपुर बाजारात टोमॅटोचा किरकोळ भाव 100 ते 160 रुपये प्रति किलो होता.