मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात अनेक व्यक्तींना विशेष सुरक्षा पुरवली होती. त्यात आपलंच सरकार असल्याने अनेक भाजप नेत्यांनी गरज नसताना केवळ स्टेटस दाखविण्यासाठी मोठ्या दर्जाच्या पोलीस सुरक्षा घेतल्या होत्या. सध्या ठाकरे सरकारने त्यासर्व सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून अनेकांची सुरक्षा घटवून राजकीय टिमक्या मिरवण्यापासून रोखले आहे. त्याचा विशेष फटका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना देखील बसत आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांना आधी वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांच्या सुरक्षेतील एस्कॉर्ट काढून घेण्यात आली आहे. आता त्यांच्यासोबत दोन हवालदार असतील. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंची एस्कॉर्ट सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि आता भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणेंची सुरक्षादेखील कमी करण्यात आली आहे. आधी त्यांना वाय प्लस सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे. यासोबतच माजी राज्यपाल राम नाईक यांची सुरक्षा झेड प्लसवरुन एक्स दर्जाची करण्यात आली आहे.
