मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. तर आठड्यातून दोन दिवस सुट्टी असणार आहे. २९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणारे आहे. त्यामुळे २९ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या जादा सुट्टीच्या बदल्यात रोज ४५ मिनिटे अधिक काम करावं लागणार आहे. त्यामुळे आता कामाची वेळ सकाळी ९.४५ वाजल्यापासून सव्वा सहा वाजेपर्यंत असणार आहे.

केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता, असं सांगितलं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत असलेला ६ दिवसांचा आठवडा पध्दत कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितलं जातं.

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली जात होती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसोबतच ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी होती. पण राज्य सरकारने त्यावर निर्णय घेतला नव्हता. अखेर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी याच महिनाअखेरपासून होणार आहे.

 

Web Title: Deputy Minister Ajit Pawar was opposed 5 working days to state government employees.

अजित पवारांचा विरोध डावलून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा?