मुंबई: मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेचे बिनसले असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राप्तीकर विभागाने सेनेच्या ताब्यातील महापालिकेतील कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेना पक्ष नैत्रुत्वाच्या विरुद्ध आघाडी उघडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापन होताच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी देखील भाजपच्या संबंधित घोटाळ्यांमध्ये लक्ष घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी चालवलेला हा खेळ काही दिवसचं बघायचा आणि सत्ता येताच चोख प्रतिऊत्तर द्यायचं अशी चर्चा शिवसेना आणि मित्रपक्षांमध्ये रंगली आहे.

मुंबई व सुरत येथे ४४ ठिकाणी तपास व छाप्याची कारवाई करण्यात आली आहे. यापुढील टप्प्यात आता पालिकेतील अधिकारी व शिवसेनेचे पालिकेशी संबंधित बडे नेते विभागाच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.

६ नोव्हेंबरला प्राप्तिकर विभागाने मुंबई आणि सुरत येथील ३७ ठिकाणी छापे घालून चौकशीला सुरुवात केली. ही ठिकाणे मुंबई महापालिकेचे कंत्राटदार आणि त्यांना या गैरव्यवहारात सहकार्य करणाऱ्या अन्य कंपन्या, वित्तीय संस्थांशी संबंधित आहेत. यातील सात ठिकाणांवर चौकशी, तपास सुरू होता. या कारवाईतून कंत्राटदार आणि त्यांच्या कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर कर बुडवल्याचे तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे हाती लागल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त आणि प्रवक्त्या सुरभी अहलुवालिया यांनी दिली.

विधानसभा निवडणूकीचा निकाल उलटून चार आठवडे होत आले तरी अद्याप राज्यातील सत्ता नाट्य संपलेले नाही. महायुतीतील महत्वाचा घटक असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगत भाजपापासून फारकत घेतल्याने या दोन्ही पक्षामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्या पाश्वभूमीवर गेल्या पाच दिवसापासून आयकर विभागाकडून महापालिकेशी संबंधित खासगी ठेकेदारावर छापे सत्र सुरु आहेत.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबईतील ३७ बडे ठेकेदार, तसेच राज्यातील काही एन्ट्री ऑपरेटरचे कार्यालये व निवासस्थानाची झडती घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७३५ कोटीच्या बोगस एन्ट्री व खर्चाच्या बनावट पावत्या मिळाल्याचे समजते. महापालिकेच्या विविध प्रकल्पासाठी जाहीर मंजूर करण्यात आलेल्या निधीचा उल्लेख असल्याचे समजते. त्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून त्याबाबत खुलासा मागण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या या व्यवहाराशी संबंधित मुंबईतील सेनेचे नेते असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या नेत्यांकडेही आवश्यकता भासल्यास चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मुंबई पालिका कंत्राटदारांवरील धाडीमार्गे सेना लक्ष? राज्यात सत्ता येताच सेना उत्तर देणार?