मुंबई: सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे.

कारण CAA अंतर्गत बाहेरील निर्वासित हिंदूंना भारतात नागरिकत्व देणार असल्याने शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला असून, देशभरातील मुस्लिम समाजाची आणि आंदोलकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. कदाचित हाच संदेश दिल्ली दरबारी पोहोचेल आणि यावरून भाजप देखील शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडेल अशी शक्यता आहे.

त्यावरून काँग्रेस आक्रमक झालीय. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात CAA लागू करू दिलं जाणार नाही असं वक्तव्य काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी केलंय. राऊत यांचं हे वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हानच असल्याचं समजलं जातंय. मंत्री नितीन राऊत म्हणाले, काँग्रेसच्या कार्यसमितीत CAA विरोधात ठराव करण्यात आलाय. त्यामुळे महाराष्ट्रात हा ठराव लागू करण्याचा प्रश्नच येत नाही. तीन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात येणार असून चर्चा होईल असंही राऊत यांनी सांगितलं.

 

Web Title:  Minister Nitin Raut comment over CAA after CM Uddhav Thackeray statement.

काँग्रेसच्या कार्यसमितीत CAA विरोधात ठराव; तर मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; काँग्रेस नाराज