मुंबई: भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापन करायची असेल, तर त्यांच्याकडे १४५ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. भाजपकडे आत्ता ११५ ते ११७ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, याची शिवसेनेला भिती आहे. त्यामुळेच शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आमदारांना अज्ञातस्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अस्थिर परिस्थितीत यंत्रणा हाती असलेल्यांकडून फोडाफोडीचे प्रयत्न होतात. मात्र शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही. शिवसेना आमदारांच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावर शरसंधान करत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले गेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बनावे, त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत. आमचे त्यांच्याशी कोणतेही व्यक्तीगत भांडण नाही. त्यामुळे फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनण्याऐवजी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बनावे असे आमचे म्हणणे मुळीच नाही, या सगळ्या अफवा आहेत, असेही राऊत म्हणाले.
Mumbai: A delegation of BJP leaders led by the party’s state chief Chandrakant Patil to meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today pic.twitter.com/Rl8G6RQWbM
— ANI (@ANI) November 7, 2019
भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची चर्चा का होत नाही, हा डेडलॉक कशासाठी, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, शिवसेना कधी कोणताही डेडलॉक ठेवत नाही, चाव्या वगैरे ठेवत नाही. शिवसेनेकडे फक्त एकच चावी आहे. आणि ती म्हणजे सत्याची चावी, असे सांगत राऊत यांनी भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही, या कडे उंगुलीनिर्देश केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असेलेल्या संबंधांबाबतही आपलं मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री आणि आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. या गोष्टींमुळे आमच्या व्यक्तीगत संबंधात कोणतीही बाधा येणार नाही. हा राजकीय प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याशी निगडीत आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
