कोल्हापूर : भाजपा आणि शिवसेनेची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात झाली. तेव्हा संपूर्ण मैदान भरून रस्त्यापर्यंत गर्दीचा रेकॉर्ड झाला. या तुफान सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या तीन मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, विनायक मेटे आणि महादेव जानकर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा अनेक लोकांशी व्यक्तिशः बोलून पाहिलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर बसलेल्या महिलांना ना मराठी येत होतं, ना मराठी समजत होतं हे त्यांनी कॅमेरावर मान्य केलं. त्यावरूनच हे लोंढे जवळच्या सीमेवरून म्हणजे कर्नाटकातून आणल्याचं प्रसार माध्यमांच्या ध्यानात आलं आणि त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमानावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी जनसागर दाखवण्यासाठी किती पैसा खर्ची केला आहे याचा प्रत्यय येत होता.

या प्रचंड सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देश चालवायला ५६ पक्ष लागत नाहीत, तर ५६ इंचाची छाती लागते. त्यांनी १५ वर्षांचे आकडे आणावेत. आम्ही चार वर्षांचे आकडे देतो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांपासून तरुणांपर्यंत सर्वांचे प्रश्‍न आम्ही सोडविले आहेत. आम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात. तर तुम्ही भ्रष्टाचार मॅनजेमेंट कंपनी आहात. आमचे कपडे उतरविणारा जन्माला यायचा आहे. काही जण स्वतः बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांनी पोपट नेमले आहेत. बारामतीचे पोपट बोलू लागले आहेत. आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाहीत. तुमचे वेगवेगळ्या निवडणुकीत कपडे सगळे गेले आहे. कोणाची सुपारी घेण्यापेक्षा घरी बसून शांत बसा. मोदी सूर्यासारखे आहेत, त्यांच्यावर थुंकाले तर तुमच्याच तोंडावर थुंकी पडेल, असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना लागविला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेताना शरद पवार यांच्यावर अत्यंत कडवट टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधकांमध्ये कोण शिल्लक राहिले आहे तेच दिसत नाही. आता त्यांचे पक्ष इतके संपत आले आहेत की, गिरीश महाजनांकडे पाहून त्यांना धाकधूक वाटते. मी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा विनंती करतो की शरद पवारांना आपल्यात घेऊ नका. त्यांनी आयुष्यभर एकच गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी राज्याला खड्ड्यात घातले. आता टायर पंक्‍चर झाल्यासारखी त्यांची अवस्था आहे. उमेदवार आणि जागांवरून अजूनही त्यांची भांडणे सुरू आहेत. शरद पवारांनीही उमेदवारी माघार घेतली. एकीकडे पाकिस्तानचा क्रिकेटपटू हा त्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. मात्र शरद पवार हे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतात. खुर्ची दिसली की त्यांना पंतप्रधानपद आठवते. आम्हाला खुर्चीचे वेड नाही. यावेळी महाराष्ट्रातून भगवा हाती घेतलेले खासदार दिल्लीत गेलेच पाहिजे, असा हट्ट मी देवी अंबाबाई आईकडे केला. माझा हा हट्ट आई नक्की पुरविणार आहे.

BJP Shivsena alliance rally at Kolhapur and many outsiders were present