जालना : भाजपचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ज्या लोकसभा मतदारसंघाच प्रतिनिधित्व करतात त्या जालन्याची अवस्था बिहारपेक्षा सुद्धा दयनीय असल्याची टीका करताना, आगामी निवडणुकीत दानवेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार अशी गर्जना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
सध्या आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रावसाहेब दानवे यांनी वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांचा साले असे उल्लेख करत त्यांच्यावर शेरेबाजी केली होती, अशी आठवण सुद्धा त्यांनी सर्वांना करून दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जाहीर घोषणा सुद्धा केली आहे.
जालन्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट झाली आहे. येथे मोठ्याप्रमाणावर रेती तस्करी चालते तसेच बेकायदा दारू विक्रीमध्ये खासदार रावसाहेब दानवेंचा सहभाग आहे, असा थेट आरोप सुद्धा बच्चू कडू यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना पराभूत करणार असा एल्गार पुकारला आहे.
