नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी नाशिक ग्रामीणकडे मोर्चा वळवल्याचे निदर्शनास येते आहे. त्यानिमित्त दिंडोरीत त्यांनी अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या आहेत. आज ते पेठ तालुक्यात कार्यकर्त्यांना भेटण्यास गेले होते, परंतु कार्यकर्त्यांसोबत स्थानिक शेतकऱ्यांनी सुद्धा तोबा गर्दी केल्याने भेटीचं रूपांतर थेट सभेत झालं.
मनसे अध्यक्षांना नाशिक दौऱ्यात मिळालेला प्रतिसाद पाहता हा आगामी निवडणुकीत भाजपसाठी इशारा समजला जात आहे. तसेच राजकीय हवा पालटल्याचे संकेत मिळताच पक्ष सोडून गेलेलं अनेक नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असल्याचे समजते. या संपूर्ण दौऱ्यात ते ग्रामीण नाशिक पिंजून काढत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांनी मुंबईला भेटीसाठी बोलावलं असून, मनसे कांदा उत्पादकांसाठी मोठं आंदोलन उभं करू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.
कालच राज ठाकरे यांनी कवडीमोलाने विकलेले कांदे मंत्र्यांना फेकून मारा असा सल्ला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिल्यानंतर आज लगेच कांद्याला २०० रुपये क्विंटलचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. परंतु, हा निर्णय आपल्याला अजिबात मान्य नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठणकावले आहे. याबाबत मी कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांशी चर्चा करणार आणि त्यानंतर माझी संपूर्ण भूमिका काय आहे ते जाहीर करणार, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
