मुंबई : मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आणि मुंबईमधील उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोंढ्यांची मतं डोळ्यासमोर ठेऊन काही ठिकाणी शिवसेनेकडून उत्तर भारतीय संमेलनं भरविण्यात आली होती. कांदिवलीच्या मागाठाणे मतदारसंघात उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी भव्य ‘उत्तर भारतीय संमेलनं’ आयोजित केलं होत. त्याला शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी सुद्धा हजेरी लावून ‘उत्तर भारतियों के सन्मान मे शिवसेना मैदान मे’ असे संदेश दिले होते.

मुंबईची मूळ समस्या ही इथे येणारे प्रचंड लोंढे असून, त्यामुळेच इथल्या मूळ पायाभूत सुविधा कोलमडून गेल्या आहेत. परंतु त्यांची मतांची टक्केवारी लक्षात घेऊन त्याचा जयजयकार करण्याचे केविलवाणे प्रयोग करण्यात शिवसेना गुंतली होती. शहरभर उत्तर भारतीय मंच देखील स्थापन करण्यात आले आहेत. मराठी मत गृहीत धरून हिंदुत्वाच्या नावाने केवळ मतांसाठी सर्व प्रकार शिवसेनेकडून उघड पणे सुरु होते.

परंतु २००८ मध्ये मराठी पाट्यांचा मुद्यावर पेटून उठलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण शहरात दरारा निर्माण करत केवळ इशाऱ्याच्या जोरावरच मराठी पाट्या लावण्यासाठी अनेकांना भाग पडले होते हे सर्वश्रुत आहे. परंतु २००८ नंतर मुंबई महापालिकेत जवळजवळ ३ टर्म सत्ताकाळ भोगणाऱ्या शिवसेनेला पुन्हां मराठी पाट्यांच्या मुद्यावर १० वर्षानंतर जाग आली आहे. कदाचित आगामी निवडणुका हे त्यामागचं कारण असावं असं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

मुंबईमध्ये मराठी पाट्यांचं आंदोलन पेटलं असताना आणि सत्ताधारी असताना सुद्धा केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आगामी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हां मराठी मुद्याची आणि मराठी आठवण झाली आहे. कारण मुंबईतील मराठी पाट्या आणि बिल्डरांकडून होत असलेल्या नामकरणाच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांना दिले. तसेच मुंबईचा प्रारुप विकास आराखडा हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असताना राज्य सरकारने तो इंग्रजीत प्रसिद्ध केला. मराठीच्या या गळचेपीबद्दल शिवसैनिकांनी सजग राहावे, असे ते म्हणाले.

जर भाजप बरोबर युती झाली नाही तर गुजराती मतांना मुकावं लागणार आहे. तसेच भाजप बरोबर सत्ताकाळ भोगल्याने अल्पसंख्यांकांची मतं मिळण्याची सुद्धा आशा धूसर झाली आहे.  उत्तर भारतीयांची संमेलनं भरवली खरी, पण उत्तर भारतीय समाज उद्या भाजप, काँग्रेस किंव्हा समाजवादी पक्षाकडे सुद्धा आयत्यावेळी आकर्षित होऊ शकतो. त्यामुळे मराठी मतदार सुद्धा उद्या राज्यातील आणि केंद्रातील विकास शुन्य कारभाराने रुसला आणि मनसेकडे वर्ग झाला तर शिवसेनेची मुंबईमधील गणितच बदलू शकतात. त्यामुळे पुन्हां मराठीच्या मुद्याला हात घालून आम्ही आहोत असं चित्र उभं केलं जाऊ शकतो.

विशेष म्हणजे केंद्रात, राज्यात आणि मुंबई महानगर पालिकेत सत्तेत असूनसुद्धा शिवसेनेला आंदोलनातून हे हाताळावं लागत आहे यातच सर्व आलं.

Now Shiv sena is diverted again on Marathi Patya issue in BMC after too long time