नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी काल संसदेच्या अर्थविषयक समितीसमोर हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून अतिरिक्त राखीव निधीवरून मोदी सरकार आणि RBI यांच्यात कटुता आली आहे. कर्ज देण्याची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक अस्थिरता ध्यानात घेता सध्या RBI’कडे ज्या प्रमाणात अतिरिक्त राखीव निधी आहे, तो भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीसाठी आवश्यक आहे असे RBI’चे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी संसदीय समितीकडे स्पष्ट सांगितले आहे.
मागील आठवडयात सुद्धा या वादावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी RBI’ची विशेष बैठक पार पडली होती. त्यादरम्यान अतिरिक्त राखीव निधी किती प्रमाणात केंद्राला देता येणे शक्य आहे, ते निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, ऊर्जित पटेल यांच्या या ठाम भूमिकेमुळे मोदी सरकारला RBI कडून मोठा निधी मिळने जवळपास अशक्य झाले आहे असं वृत्त आहे.
RBI हा राखीव निधी कोणत्याही सामान्य गरजांसाठी नव्हे तर भविष्यात देशान्तर्गत कठिण आर्थिक काळात वापरण्यासाठी ठेवला आहे असे उत्तर ऊर्जित पटेल यांनी अर्थविषयक समितीला दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. अतिरिक्त राखीव निधीवरुन RBI आणि मोदी सरकारमध्ये असलेल्या वादावर प्रथमच गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट पणे मांडली आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला RBI’कडे ९.७ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड राखीव आहे.
