जयपूर : सध्या देशभरात इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आणि त्या अनुषंगाने वाढत्या महागाईमुळे सामान्य हैराण झाले असताना देशातील मंत्र्यांना त्याची काहीच झळ बसत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेत तसंच काहीस सत्य समोर आलं आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या या विधानाने मोदींच मंत्रिमंडळ महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांची खिल्ली उडवत आहेत काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण जयपूर येथे आले असता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांबद्दल आणि महागाईबद्दल प्रश्न विचारला असता, ‘पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काहीही फरक पडत नाही, मंत्रिपद असल्यामुळे डिझेल आणि पेट्रोल मोफत मिळत असल्यानं वाढत्या दरांबाबत जास्त विचार करत नसल्याचंही आठवले यांनी म्हटले आहे.

नक्की काय प्रतिक्रिया दिली आठवलेंनी?

”पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती काय आहेत, याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल”, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी शनिवारी जयपूर येथे केले. ”पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनता होरपळतेय, ही बाबदेखील मान्य आहे. इंधनाच्या वाढणाऱ्या किमती कमी करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे”,असेही यावेळेस आठवले यांनी म्हटले.

RPI chief Ramdas Athawale talked on increasing Petrol and Diesel price in india