पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर असून ते निवडणूकपूर्व देवदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा सत्ताकाळात विकास कामं दाखविण्यापेक्षा ते देवाच्या नावाने दौरे करून निवडणूकपूर्व तयारी करत आहेत अशी राजकीय चर्चा आहे.

वास्तविक दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये असलेली शिवसेना सत्ताकाळातील आपल्या डझनभर मंत्र्यांचा आणि आमदार-खासदारांचा विकासाचा पाढा वाचण्याऐवजी मतदाराला केवळ धर्म आणि देवाच्या नावाने विचलित करू पाहत आहेत असंच म्हणावं लागेल. मुंबई महापालिकेवर तीन दशकं सत्ता गाजवलेल्या शिवसेनेला मुंबईमधील अस्तित्व संपल्यात जमा असलेली मिठी नदी कधी आठवली नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशातील शरयू नदी मात्र आठवली होती.

त्यांच्यानुसार अयोध्येची वारी ही राममंदिर प्रश्नी ४ वर्षे झोपलेल्या कुंभकर्णास जागे करण्यासाठी होती. तर पंढरपूरची वारी मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी आहे अशी आरोळी दिली आहे. सरकारला जागे करण्यापेक्षा ते घालवलेलेच बरे. त्यासाठी जनतेने उसळून उठायला हवे असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आज आम्ही त्याच पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन महाराष्ट्राच्या जनतेस निर्मळ, चांगले दिवस यावेत यासाठी साकडे घालणार आहोत. महाराष्ट्रावर दुष्काळाचे भयंकर सावट आहे आणि देशाचे राज्यकर्ते सत्तेच्या मस्तवाल राजकारणात मशगूल आहेत. उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येनकेनप्रकारेण जिंकायच्याच यासाठी जी अक्कल पणाला लावली जात आहे ती राज्याच्या प्रगतीसाठी, दुष्काळ निवारणासाठी लावली तर राज्यात भूकबळी आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

काय आहे आजच्या संपादकीय मध्ये नक्की?

shivsena chief on pandharpur tour