नवी दिल्ली : आज ७२ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर देशाला संबोधित करताना अनेक मुद्दे मांडले आणि भविष्यातील योजनांची जनतेला माहिती करून दिली. भारत हा मागासलेला देश नसून तो तंत्रज्ञान, कृषी, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात भारतानं प्रगती केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातले खालील दहा प्रमुख मुद्दे मांडले:
१. महिलांनी चांगलीच प्रगती केली असल्याचं सांगताना मोदींनी आएनएस तारिणी या संपूर्णपणे महिला असलेल्या जहाजाचा दाखला दिला. भारतीय नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी नुकतीच जगाला प्रदक्षिणा घातल्याचे त्यांनी अभिमानानं सांगितलं. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.
२. सगळ्या स्तरातल्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळण्याचं महत्त्व मोदींनी अधोरेखीत केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सगळ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे असे त्यांनी सांगितले.
३. करदात्यांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की आज आपण प्रामाणिकपणा आणि करदायित्व या गोष्टीही साजरा करत आहोत. करदात्यांचा पैसा हा चांगल्या कामांसाठीच वापरला जातो यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रत्येक करदात्याचा पैसा हा भारतातल्या तीन गरीब कुटुंबांचं पोट भरण्यासाठी वापरला जातो असं ते म्हणाले.
४. काळ्या पैशाबाबत बोलताना मोदींनी सांगितलं की सरकारच्या योजनांमध्ये तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. सरकारी योजनांमध्ये तब्बल सहा कोटी बोगस लाभार्थी होते, ज्यांना मी बाजुला केले आहे असे त्यांनी सांगितले.
५. गेल्या दोन वर्षांमध्ये पाच कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा मोदींनी केला आहे. भारतातली गरीबी संपवण्यासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्या सरकारनं प्रयत्न केल्याचे मोदी म्हणाले.
६. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तब्बल चार कोटी लाभधारकांना लहान उद्योगासाठी १३ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगताना हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
७. काश्मीरमध्ये गोली व गाली या दोघांवर आपला विश्वास नसल्याचे त्यांनी सांगितले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या उद्गारांचा दाखला देत मोदींनी काश्मीरची समस्या गले लगाने से म्हणजे प्रेमानं संपेल असे त्यांनी सांगितले. त्रिपुरा, मेघालय व अरूणाचल प्रदेशमध्ये ऐतिहासिक शांतता नांदत असून डाव्यांचा कट्टरतावाद आता १२६ जिल्ह्यांच्या तुलनेत ९० जिल्ह्यांपर्यंत मर्यादित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
८. भारतातल्या वाढत्या बलात्काराच्या घटनांचीही त्यांनी दखल घेतली. पुरूषांच्या सैतानी वृत्तीला महिला बळी पडत असल्याचं त्यांनी सांगितलं. कायदा व सुव्यवस्थेबाबत ते म्हणाले की, महिलांचा आदर करण्याचे संस्कार तरूण मनांवर करायला हवेत. मुस्लीम महिलांचं आयुष्य तिहेरी तलाक उध्वस्त करत असल्याचं सांगत आपण ही प्रथा संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. मुस्लीम महिलांना न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत राहू असंही ते म्हणाले.
९. कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
१०. स्वच्छ भारत अभियानामुळे लाखो लहान मुलांना आरोग्यदायी जीवन मिळाल्याचा दावा मोदींनी केला आहे. उज्ज्वला व सौभाग्य या योजनांबाबतही त्यांनी प्रशंसोद्गार काढले व सर्वसामान्य भारतीयांचं जीवन बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी जनआरोग्य अभियान ही आरोग्य सेवा जाहीर केली असून गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. देशातल्या १० कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार असून २५ सप्टेंबर रोजी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
