श्रीहरीकोटा : भारताच्या अत्यंत महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय इस्रो’ने घेतला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. पूर्वनियोजित योजनेप्रमाणे आज मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. परंतु ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.

लौंचिंग’नंतर तब्बल ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर दाखल होणार होते. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे देखील लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.

चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.

तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, लवकरच नवीन वेळ जाहीर करणार