मुंबई : खंबाटा एअर लाईन्स कंपनी कायमची बंद होऊन तब्बल २ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्यामुळे देशोधडीला लागलेले कामगार आज सुद्धा त्यांच्या हक्काच्या देयकांच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी कंपनीच्या ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी मुंबईतील सहार रोड परिसरात आंदोलन सुरु केले होते. तब्बल ५ दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान अन्यायग्रस्त कामगारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार विनायक राऊत यांच्या नावाने अक्षरशः सार्वजनिक शिमगा केला.
त्यावेळी खंबाटा कंपनीत जवळपास २७०० कर्मचारी कार्यरत होते. खंबाटा कंपनीसाठी हजारो कर्मचाऱ्यांनी आयुष्याची तब्बल ३५ वर्ष खर्ची घातली आहेत. या कंपनीत शिवसेनेची कामगार संघटना होती. इतकंच नाही तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापून घेण्यात येत होती. खंबाटा कंपनी बंद झाल्यानंतर २ वर्षांनंतर सुद्धा या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम सुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मराठी माणसाच्या नावाने हंबरडा फोडणाऱ्या तसेच त्यांच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेच्या युनियनने कामगारांची फसवणूक केलीच, शिवाय कंपनी बंद झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या परिवाराला उघडयावर सोडले गेले अशी त्यांची खंत आहे.
खंबाटा कंपनी बंद करण्यात सुद्धा शिवसेना युनियनच्या नेत्यांचा हात होता, असा कर्मचाऱ्यांचा थेट आरोप आहे. खंबाटा कंपनीचा मालक सध्या फरार झाला आहे. परंतु गेले ५ दिवस हे कर्मचारी उपोषणाला बसले होते. दरम्यान या ५ दिवसात कर्मचाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युनियनचे नेते विनायक राऊत तसेच कंपनीचे अधिकारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळालं.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत उपोषणात जाहीर सहभाग सुद्धा घेतला होता. काल सकाळी उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांची कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी चर्चा झाली. परंतु विमान वाहतूक हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने आपण कामगारांच्या या मागण्यांची शिफारस केंद्राकडे करू, असे आश्वासन निलंगेकर यांनी उपोषणावर बसलेल्यांना दिल्यानंतर अखेर ५ दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले आहे.
